पहिली ते आठवी दुमाही मूल्यमापन
दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांची वाचन, लेखन व इतर क्षमता जोखणार
पुणे । दि. २१ (प्रतिनिधी)
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत नसल्याच्या पार्श्व भूमीवर दर २ महिन्यांनी चाचणी घेऊन त्यांच्या वाचन, लेखन व इतर क्षमतांचे मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण सचिव सुमीत मलिक यांनी दिली.
'महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे'च्या वतीने आयोजित 'शैक्षणिक गुणवत्तासंवर्धन मोहिमे'च्या अंमलबजावणीचे उद्घाटन माजी खासदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी शिक्षण संचालक विजय देऊसकर यांच्यासह राज्यभरातून शिक्षण संचालक व उपसंचालक उपस्थित होते.
मलिक म्हणाले, ''विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी दर २ महिन्यांनी विद्यार्थ्यांची फक्त अध्र्या तासाची चाचणी घेतली जाईल. यामध्ये अक्षरज्ञान, वाचनकौशल्य, लेखनकौशल्य, गणिताचे ज्ञान यांचे मूल्यमापन केले जाईल. राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांची ही माहिती संगणकाद्वारे एकत्रित केली जाईल. त्यानंतर जे विद्यार्थी मागे पडत आहेत, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष पुरविण्याचा सूचना शिक्षकांना केल्या जाणार आहेत.''
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तासंवर्धनाची मोहीम राज्यभरातील अनुदानित, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमध्ये राबविण्यात येईल. राज्यभरातील २ कोटी विद्यार्थ्यांकरिता ही मोहीम राबविली जात आहे. सप्टेंबरच्या दुसर्या् आठवड्यापासून याला सुरुवात केली जाईल. याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना ऑगस्टमध्ये देण्यात येईल. तसेच, राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकत्रितपणे गोळा करण्याकरिता संगणकाचे विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यामागे शासन १२ हजार रुपये खर्च करीत आहे.
देवीसिंह शेखावत म्हणाले, ''शैक्षणिक गुणवत्तासंवर्धन कार्यक्रमामध्ये शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना सहभागी करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जावा. विद्यार्थ्यांना लहानपणापासून तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्तासंवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करून महाराष्ट्राचा देशापुढे चांगला आदर्श निर्माण होऊ शकेल.''
अमरावतीच्या प्राथमिक शाळेतील ८२ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचे एका सर्व्हेमध्ये आढळून आल्यानंतर तेथे गुणवत्तासंवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानंतर तेथील स्थिती झपाट्याने बदलली. हा प्रयोग मलिक यांनी राज्यभर राबविण्याचे ठरविले असल्याचे देऊसकर यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment